110. द्वंद्वातीतातून शांती

 

श्रीकृष्ण म्हणतात, “ज्याला संन्यास असे म्हणतात, तोच योग्य आहे, असे तू समज, कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही” (6.2). आधी असेही म्हटले गेले आहे की ऋषीचे प्रयत्न हे काम आणि संकल्प विरहित असतात (कामसंकल्पवर्जिताः) (4.19).

श्रीकृष्ण पुढे म्हणतो,योगावर आरुढ होण्याची इच्छा करणार्‍या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी ‘निष्काम कर्म करणे’  हाच हेतू सांगितला आहे आणि योगारुढ झाल्यावर त्या योगारुढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो, तोच कल्याणाला कारण सांगितला आहे (6.3). ज्यावेळी इंद्रियांच्या भोगांत किंवा कर्मांतही पुरुष आसक्त होत नाही, त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते(6.4).

आपण असे मानतो की इच्छित कर्मफलाच्या प्राप्तीसाठी कर्म केले जातात आणि तसे नसेल तर कुणी कशासाठी कर्म करेल? येथे हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल किंवा तिचा अनुभव नसेल, याचा अर्थ असा नाही की ती गोष्टच अस्तित्वात नाही. पहिले, कर्मफलांसाठी केलेल्या आपल्या पूर्वीच्या कर्मांच्या अनुभवांचे विश्लेषण केले पाहिजे, जे आनंददायी परिणामांसाठी केले गेले, आणि त्यापैकी बहुतेकांमुळे दु:खच पदरात आले होते.  दुसरे, कर्म फलांची अपेक्षा न करता लहान लहान कर्मे करणे सुरू करा आणि अशी कर्मे करणे शक्य आहे या कृष्णाने दिलेल्या आश्वासनावर श्रद्धा ठेवा. अंतिमत:, कौतुक आणि टीका यांच्या द्वंद्वाच्या पल्याड जाण्यातच (द्वंद्वातीत होणे) शांतता आहे.

श्रीकृष्ण वारंवार निष्काम कर्माबद्दल आणि भौतिक बाबींची आसक्ती न बाळगण्याचा सल्ला देतात. बाह्य जगाशी जोडून घेण्यासाठीचे साधन म्हणून आणि भौतिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्राथमिक निर्णय घेण्यासाठी इंद्रियांचा वापर करावा. त्यापलीकडे कोणतीही आसक्ती बाळगल्यास आपण कर्मबंधनात अडकतो.

उदाहरणार्थ, आपण एखादी सुंदर वस्तू बघतो, आपण तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो आणि पुढे निघतो. ही अनासक्ती आहे. मात्र, त्याबद्दल आसक्ती निर्माण झाली तर ती वस्तू प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यातून मग विशिष्ट उद्देशाने कृती घडत जातात.


Comments

Popular posts from this blog

89. स्वत: ला मुक्त करा

88. पापाचे पैलू

75. धर्म एक आहे